Home News & Events दहा वर्षांत ‘हायपरलूप’!

दहा वर्षांत ‘हायपरलूप’!

735
0
hyperloop one

दहा वर्षांत ‘हायपरलूप’!

हॉलिवूडमधील सायफाय (विज्ञानाधारित) चित्रपटांत नट एका ट्युबमध्ये बसतो व एका क्षणात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर पोहोचतो. ही ट्यूब लवकरच प्रत्यक्षात येणार आहे. कारण मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प दशकाच्या अवधीत पूर्ण होण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या तंत्रज्ञानामुळे मुंबई-पुणे हे अंतर अवघ्या २० मिनिटांत कापता येणार आहे. पुढील पाच वर्षांच्या कालावधीत याची पहिली प्रत्यक्ष चाचणी आवाक्यात आहे.

प्रकाशाच्या वेगाशी स्पर्धा करत प्रवास करणाऱ्या या ‘हायपरलूप’च्या भारतातील प्रकल्पासाठी राज्य सरकारने ‘व्हर्जिन हायपरलूप १’ या कंपनीशी करार केला आहे. या कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष व ‘नासा’च्या शास्त्रज्ञ अनिता सेनगुप्ता यांनी शनिवारी नेहरू विज्ञान केंद्रात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाढती लोकसंख्या आणि अपुरी पडणारी प्रवासाची माध्यमे याचे गणित मांडत नवीन तंत्रज्ञान यावर कसे उपयुक्त ठरू शकेल, याचा लेखाजोखा मांडला.

‘सन १९०३नंतर वाहतुकीच्या याच साधनांमध्ये नवनवीन बदल होत गेले, मात्र नवीन कोणतेही साधन उपलब्ध झाले नाही. ते साधन आता हायपरलूपच्या स्वरूपात उपलब्ध झाले आहे’, असे सांगत सेनगुप्ता यांनी या संशोधनाचे महत्त्व पटवून दिले. ‘कमी खर्चात अधिक जलद प्रवास करण्यासाठी सध्या हे तंत्रज्ञान उपयुक्त असून, जगभरातील विकसित देश याचा स्वीकार करत आहेत. मात्र जेथे जास्त लोकसंख्या सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून आहे, तेथे याचा उत्तम उपयोग होऊ शकतो. यासाठी महाराष्ट्रात मुंबई-पुणे या मार्गावर हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पाच वर्षांत ‘हायपरलूप’चे निष्कर्ष

‘हायपरलूप हा प्रकल्प लॉस एंजेल्स येथे प्रायोगिक तत्त्वावर साकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातही त्याचे काम सुरू आहे. मुंबई-पुणे या मार्गावर हा प्रयोग कसा काम करेल याची तांत्रिक चाचणी करण्यासाठी लवकरच पायाभूत सुविधा उभारल्या जातील व पुढील पाच वर्षांत त्याची चाचणी होऊन निकाल समोर येतील’, असे ‘व्हर्जिन हायपरलूप १’ कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष व ‘नासा’च्या शास्त्रज्ञ अनिता सेनगुप्ता यांनी सांगितले. ‘हायपरलूप हे तंत्रज्ञान १०० टक्के इलेक्ट्रिक प्रणालीवर अवलंबून आहे. यामुळे कार्बनचे उत्सर्जन प्रतिवर्षी कमी होणार आहे. या एका प्रकल्पामुळे पर्यावरण रक्षण, अपघातांच्या संख्येत घट, वाहतूक कोंडीतून सुटका असे अनेक सामाजिक व आर्थिक फायदेसुद्धा होतील’, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

असे आहे हायपरलूप तंत्रज्ञान

भारतात मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पाबाबत हालचाली सुरू होण्यापूर्वीच चेन्नई-बंगळुरू या प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. भारतासारख्या देशात कमी खर्चात जलद व पर्यावरणस्नेही प्रवास देणाऱ्या वाहतूक साधनांची आवश्यकता आहे. यातूनच या प्रकल्पाची संकल्पना भारतात राबविण्याचे ठरविण्यात आले. हायपरलूप तंत्रज्ञानानुसार ट्यूबमधील हवा शोषणासाठी ट्यूबच्या तोंडाला अजस्त्र कम्प्रेसर लावून पोकळी निर्माण करण्यात येते. ट्यूबच्या पोकळीतून वेगाने धावण्यासाठी प्रवासी कॅप्सुल असेल. मॅग्नेटिक लेव्हिटेशन तंत्रज्ञानामुळे कॅप्सूल आणि रुळांदरम्यानचे घर्षण संपुष्टात येईल. ही ट्रेन ताशी १,२१६ किमीच्या वेगाने धावणार असल्याने ३५ मिनिटांचा हा प्रवास अवघ्या ३० डॉलरमध्ये म्हणजे २००० रुपयांत होऊ शकतो.

दळणवळणाचा इतिहास

– इ. स. पूर्व ३२०० : चाकाचा शोध

– सन १८०४ : इंजिनचा शोध

– सन १८८६ : मोटार धावली

– सन १९०३ : विमानाची भरारी

source: Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

18 − 16 =